डोंगर खंडाळ्यातील उत्पादन जाणार विदेशात – राधेश्यामजी चांडक
बुलडाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- भारतातील उत्पादनांना विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
बांगलादेश येथे मोठ्या प्रमाणात संत्रा पाठविला जातो, तर अफगाणिस्तान येथे कांद्याची मागणी असल्याने भारतातून कांदा पाठविला जातो. नुकताच नेदरलँड येथील कंपनीशी करार करण्यात आला असुन आता डोंगर खंडाळा येथील उत्पादित गुलाबाची फुले नेदरलँड येथे पाठविली जाणार आहे, हि बाब जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे. अशाच प्रकारे जगाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता डोंगर खंडाळा गावात यावी,व डोंगर खंडाळाचे नाव जगभरात व्हावे असा मनोदय बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष श्री राधेशाम चांडक उपाख्य भाईजी यांनी व्यक्त केला. ते डोंगर खंडाळा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी बुलढाणा, कैशा ग्रीन्स प्रायव्हेट लिमिटेड अहमदाबाद व एचडीएफसी बँक बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले होते . सदर कार्यक्रम दि.16 ऑक्टोबर रोजी डोंगर खंडाळा येथे शेतकऱ्यांसाठी सेमिनारचे आयोजित करण्यात आले होते. सदर सेमिनारचे आयोजन बुलढाणा अर्बन, कैशा,व एच.डी.एफ.सी.बँकेच्या वतीने करण्यात आले होते.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा, आणि बुलढाणा अर्बन परिवार यांच्यामार्फत 11 ते 13 सप्टेंबर 2023 ला 93 शेतकरी सभासद तसेच 11 ते 13 ऑक्टोंबर 2023 रोजी 111 शेतकरी सभासद यांना पॉलिहाऊस ,गाई म्हशी पालन, शेळीपालन ,झिंगे शेती, खेकडा शेती ,वराह पालन याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणावर आधारित 16 ऑक्टोबर रोजी सेमिनार घेऊन तज्ञ मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना उपस्थित त्यांना मार्गदर्शन करत असताना चांडक म्हणाले की, येणारा काळ हा शेतीचा काळ आहे . 60 ते 70 च्या दशकात भारताची लोकसंख्या ही 50 कोटीच्या जवळपास होती त्या काळात भारतातील लोकांना अन्नाचे तुटवडा भासत होता. त्यावेळी सर्वांनी लाल ज्वारीचा अनुभव घेतला आज भारताने एवढी प्रगती केली आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात अन्नधान्य पाठवीत आहे .आज भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे देशाची लोकसंख्या प्रचंड वाढली असताना सुद्धा ही परिस्थिती आहे .आज आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत मुंबईपर्यंत प्रवास मात्र सहा तासात पूर्ण केला जातो . जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाता येते कुठेही अन्नधान्य पाठवता येते ही परिस्थिती पाहता शेतीला चांगले दिवस येतील असे संकेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील असेही ते म्हणाले .
या कार्यक्रमास डॉक्टर सुकेश झंवर (बुलढाणा अर्बन चीफ मॅनेजिंग डायरेक्टर ) यांनी मार्गदर्शन केले. आणि सोबतच डॉ. अनिल तारू (कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा) प्रसाद तोडकर (ॲग्री हेड) एच. डी. एफ. सी. बँक बुलढाणा श्री. विलास बिहाडे (सेवा प्रदाता) पोक्रा स्मार्ट एन. एच .एम .आर. के .व्ही .(कृषी विभाग राज्य सरकार )डॉक्टर देशमुख सर (पशुसंवर्धन विकास) श्री अरुण पटेल कैशा ग्रीन्स प्रा. चे सिईओ यांनी हि उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. किशोरजी केला (संचालक बुलढाणा अर्बन )शेळके मॅडम (कृषी सहाय्यक ) ,अनिल शेळके (चॅनेल पार्टनर कैशा ग्रीन्स) सुरज कोमाकुलवार (बिजनेस ॲडव्हायझर) योगेश पटेल (चीफ मॅनेजिंग डायरेक्टर कैशा ग्रीन्स प्रायव्हेट लिमिटेड) व कैशा ग्रीन चे कर्मचारी,तसेच डोंगर खंडाळाचे सरपंच बबनलालाजी गाडगे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बुलडाणा अर्बन शाखा डोंगर खंडाळा , तसेच सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा प्राचार्य श्री सतीश रोडे सर शाखेचे सर्व कर्मचारी ,गोदाम कर्मचारी, स्पिनिंग मिलचे कर्मचारी , सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळाचे कर्मचारी अन्नछात्रालय महिला कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कुमार काकडे यांनी केली व आभार प्रदर्शन मांडले.