‘श्रीं’चे दर्शन घेऊन रविकांत तुपकरांच्या सोयाबीन-कापूस ‘एल्गार रथयात्रे’ला शेगावातून दणक्यात सुरूवात…
हे गजानना..सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे : शेतकऱ्यांसह तुपकरांची श्रींच्या चरणी प्रार्थना
शेगाव – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – हे गजानना.. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना करत संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन-कापूस ‘एल्गार रथयात्रे’ला सुरुवात केली. 5 नोव्हेंबर रोजी श्रींच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करत रथयात्रेचा शेतकऱ्यांच्या गर्दीत दणक्यात श्री गणेशा झाला.
आज आणि उद्या दोन दिवस खामगाव तालुक्यात फिरून ही यात्रा समोर मार्गस्थ होणार आहे. सोयाबीन – कापसाला दरवाढ मिळावी तसेच येलो मोझॅक,बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी व शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या अनुसार आज पाच नोव्हेंबर रोजी रोजी श्रींचे दर्शन घेऊन शेगावातून रथयात्रेला सुरुवात झाली. राज्य शासनाने केवळ 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.
इतर तालुक्यांमध्ये शासनाला सर्वत्र हिरवेगार दिसत आहे का? असा संतप्त सवाल करत सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा. शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या शासनाने तातडीने गांभीर्याने घेत पूर्ण कराव्या यासाठी आता आरपारची लढाई लढणार असल्याचे या वेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले. जलंब नंतर पहुरजीरा, माक्ता, माक्तावाडी, घाटपुरी, जळका भडंग, पिंपळगाव राजा, निपाणा, भालेगाव, ढोरपगाव, काळेगाव तर ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता नांद्रा नंतर मांडणी, रोहणा, वर्णा फाटा, कंझारा फाटा, गोंधणापूर फाटा, मांडवा फाटा, शिरसगाव देशमुख, खामगाव शहर, टेंभुर्णा,आवार, अटाळी, गौंढाळा व रात्री आठ वाजता लाखनवाडा अशी ही यात्रा फिरणार असून त्यानंतर पुढे मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली अशी ही यात्रा जाणार आहे. गावोगावी शेतकऱ्यांच्या भेटी, बैठका आणि सभा घेऊन शेतकरी व तरुणांची फौज एकत्र करत 20 नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे भव्य महाएल्गार मोर्चा काढून शासनाची झोप उडवणार असल्याची रविकांत तुपकर यांनी सांगितले. पाच नोव्हेंबर पासून या यात्रेला दणक्यात सुरुवात झाली असून 20 नोव्हेंबर पर्यंत जिल्हाभर ही यात्रा फिरणार आहे. केवळ शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या हा एकमेव अजेंडा घेऊन ही यात्रा आणि आंदोलन होणार असल्याने पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून, शेतकरी-शेतमजूर म्हणून या एल्गार आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.