नमो शेतकरी’ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बँक खाते सुरु असल्याची खात्री करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलढाणा आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. राज्यात योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी काही बाबी तपासून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्याचे बँकेकडून खाते बंद किंवा गोठविले असल्यास लाभार्थ्याने बँकेत जाऊन तपासून घ्यावे. ते सुरू करुन घ्यावे किंवा दुसरे सुरू असलेले खाते आधार संलग्न करुन घ्यावे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडावे. आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसल्यास अथवा बँकेने एनपीसीआय पोर्टलवरून आधार क्रमांक डीसीडेड केला असल्यास बँकेशी संपर्क साधावा. बँकेने खात्यावर कमाल क्रेडीट मर्यादा निश्चित केली असल्यामुळे खाते धारकाने व्यवहार मर्यादा वाढवून घ्यावी. बऱ्याच कालवधीपासून खाते वापरात नसल्यास ते बंद असते. त्यामुळे खाते धारकाने बँकेशी संपर्क साधावा. त्याशिवाय अनिवासी बाह्य बँक खाते (एनआरई), भविष्य निर्वाह निधी, कॅश क्रेडीट खाते, कर्ज खाते किंवा मुदतठेव या प्रकारचे खाते असल्यास ते संलग्न करून घ्यावे. खाते धारकाने बँकेत जाऊन केवायसी प्रलंबित नसल्याची खात्री करून घ्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.