Home

सातत्यपूर्ण निवडणूक शिक्षणासाठी जिल्ह्यात 57 लोकशाही दालन

बलशाली भारतासाठी युवकांमध्ये लोकशाही रूजविणे आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

Spread the love

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी : भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सुदृढ लोकशाही व्यवस्थेत युवकांची महत्त्वपूर्ण भुमिका आहे. तसेच त्यांच्यामध्ये लोकशाही मुल्यांचा प्रचार-प्रसार करुन लोकशाहीबाबत जबाबदारी आणि जाणीव निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील ५७ वरीष्ठ महाविद्यालयात लोकशाही दालन स्थापन करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच युवकांमध्ये शाश्वत लोकशाहीचा संस्कार रुजविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.भारत हा लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. एक सक्षम लोकशाही म्हणून विश्वस्तरावर भारताची विशेष ओळख आहे. लोकांनी लोकांचे व लोकांसाठी निवडुन दिलेले सरकार हे या देशातील राजकीय व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामपंचायतीपासून ते भारतीय संसदेपर्यत नियुक्त प्रतिनिधींना सार्वत्रिक निवडणुकीद्वारे राज्यकारभारासाठी निवडण्याचा जनतेला मौलिक अधिकार प्राप्त झाला आहे. दर पाच वर्षांनी प्रक्रियेद्वारे आपला प्रतिनिधी राजकीय व्यवस्थेत पाठविण्याचा जनतेला मुलभूत अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकारामुळे प्रत्येक मतदाराने मतदानाचे कर्तव्य पार पाडणे, हे सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक सुजान भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक मतदार जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

जनजागृतीसाठी जिल्ह्यातील 57 वरिष्ठ महाविद्यालयामध्ये लोकशाही दालन स्थापन करण्यात आले आहे. सदर दालनात मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदानाचा अधिकार, मतदाराचे कर्तव्य, यासोबतच संवैधानिक मूल्य अशा स्वरूपातील विविध दृकश्राव्य साहित्य साधने, भित्तीपत्रके, चित्र प्रदर्शनी, भारत निवडणूक आयोगाने मतदार जाणीव जागृतीसाठी प्रसिद्ध केलेले विविध साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या माध्यमातून सातत्यपुर्ण निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही शिक्षण उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना निवडणूक प्रक्रियेविषयी शिक्षित करून युवकांच्या आणि विशेषत: पहिल्यांदाच मतदानास जाणाऱ्या नवमतदारांच्या लोकशाही व्यवस्था व संवैधानिक मूल्य यामध्ये सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हा स्विप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी दिली आहे. भारत, जगातील एक तरुण लोकसंख्येचा देश असताना युवकांची निवडणूक प्रक्रियेतील असंवेदनशीलता व अनिच्छा दूर करून भविष्यातील युवा पिढीला मतदान प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी आणि सुदृढ लोकशाहीसाठी हा उपक्रम आशादायी असल्याची भावना बी. एम. मोहन यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page