लहान मुलांच्या पाठीवरील दप्तरांच्या ओझ्याचा भार कधी होणार कमी?
पालकांचा मोठा प्रश्न....
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- शाळा सुरू होणार असल्याने प्रशासकीय पातळीवर पुस्तके, शालेय गणवेश याबाबतचे नियोजन आताच सुरू आहे. शासन दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्नशील असले, तरी प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणीला म्हणावे तसे यश येताना अपवादानेच दिसून येत आहे. त्यामुळे मुलांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा भार कमी होईल का, असा प्रश्न पालकांना पडला आहे.शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामध्ये वही आणि पुस्तक वेगवेगळ्या बाळगण्यापेक्षा पुस्तकालाच वह्यांची पाने जोडण्याचा प्रस्ताव समोर आला. या पार्श्वभूमीवर शिक्षणतज्ज्ञ व पालकांमधून मागवण्यात होत्या. सूचना आल्या त्यानुसार बालभारतीच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून अंमलबजावणी झाली आहे. सर्व सरकारी खासगी व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांना प्रत्येक घटकानंतर वह्यांची पाने लावण्यात आली.मात्र, खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये त्यांनी निवडलेला अभ्यासक्रम असतो. त्यामध्ये ही पद्धत दिसून येत नाही. परिणामी खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एकाच विषयाच्या दोन-तीन पुस्तिका व सोबतच वह्या बाळगाव्या लागतात. यावर उपाय योजना करण्यची गरज आहे.एकापेक्षा अधिक पेन, पेन्सिल व इतर शालेय साहित्य, एकाच विषयाला एकापेक्षा जादा वह्या, प्रॅक्टिकलचे साहित्य, चित्रकला, कार्यानुभव व प्रोजेक्टचे साहित्य. पाठ्यपुस्तकात कोरी पाने जोडून दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांचे ओझे कमी झाले का, याची पाहणी होत नाही.
या विद्यार्थ्यांचा वाली कोण?
खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये संस्था निवडणार तोच अभ्यासक्रम शिकविला जातो. परिणामी त्यांच्या मर्जीनेच पालकांना पुस्तकं व वह्यांची खरेदी करावी लागते. आजही कित्येक शाळांमध्ये एकाच विषयाच्या दोन-तीन पुस्तिका असून, सोबत वही द्यावी लागते. सर्व सरकारी व खासगी अनुदानित शाळांमध्ये पुस्तकांना कोऱ्या पानांची जोड देऊन शासनाने त्या विद्यार्थ्यांची सोय करून दिली. त्यात आता दप्तर मुक्त शनिवार हा उपक्रम राबविला जात आहे. मात्र, खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वाली कोण ? असा सवाल पालक व विद्यार्थी करीत आहेत.