येळगाव धरणातून गाळ काढण्यास सुरुवात
बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती योजनेला येळगाव धरण परिसरात शुक्रवार, दि. 17 मे 2024 रोजी सकाळी 11.00 सुरूवात झाली.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी प्रणित श्री सुमेरू रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड बंगलोर, कर्नाटक आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक रविंद्र लहाने, येळगावचे सरपंच श्री. तवकर, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे जलतारा प्रकल्प मेंटर सुनील भोजवानी, भगवान सावळे, चंदू पैठने, जलयुक्त शिवारचे जिल्हा समन्वयक गोपाल वेरूळकर, भुषण मोरे, मयूर स्वामी, नितीन देशमुख, सुदर्शन खरात उपस्थित होते.
सुरवातीला गुरुपूजेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित ट्रॅक्टर आणि जेसीबी चालक-मालक यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. भविष्यामध्ये परिसरातील शेती सुपीक करण्यासाठी आणि येळगाव धरण गाळमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा. यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी शासन आणि श्री सुमेरू रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड, बंगलोर यांच्या वतीने शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले.