नागरिकांनी डाक जीवन विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा या योजनाद्वारे नागरिकांना विमा सुरक्षा देण्यात येतात. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
यामधील डाक जीवन विमा या कल्याणकारी योजनेची सुरुवात १ फेब्रुवारी १८८४ रोजी करण्यात आली आहे, या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यात आता केंद्र सरकारचे कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थाचे कर्मचारी, भारतीय रिझर्व बँक, सरकारी बँक, खासगी बँकेचे कर्मचारी, शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाचे कर्मचारी, सनदी लेखापाल, वकील, डॉक्टर, एनएससी, बीएससीवर सूचीवद्ध झालेल्या कंपन्यांतील कर्मचारी, सर्व पदवीधर आणि डिप्लोमाधारक यांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच ग्रामीण डाक जीवन विमा ही योजना २४ मार्च १९९५ ला ग्रामीण भागातील नागरिकांना विमा सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आली. यामध्ये वय वर्षे १८ ते ५५ या वयोगटातील ग्रामीण भागातील रहिवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. डाक विभागाच्या योजना या कमी प्रीमिअम जास्त बोनस या तत्वावरील आहेत. भारतीय डाक विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या या योजना कमी प्रीमिअम जास्त बोनस यामुळे नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. आतापर्यत जवळपास दीड कोटीहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. उत्कृष्ट परतावा देणाऱ्या विमा योजनेचा लाभ घेण्याकरिता नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.