शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर पुन्हा ॲक्शन मोडवर हक्काच्या पिकविम्यासाठी दिली कृषी कार्यालयात धडक…
गेल्या वर्षीचा राहिलेला पिकविमा तात्काळ द्या...अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल - रविकांत तुपकर

बुलढाणा आपलं बुलढाणा जिल्हा बातमी – निवडणूक काळात सगळ्या भानगडीपासून दोन पावले मागे असणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आता निवडणूक होताच शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी दोन पावले पुढे आले आहेत. गेल्या वर्षीच्या पिकविम्यापासून वंचित असलेल्या पात्र-अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्या, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिली.
बुलढाणा जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या 1 लाख 26 हजार 269 शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देवून अपात्र केलेल्या 70 हजार 831 शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. पिकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 235 कोटी 55 लक्ष रु. रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे. तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम जमा करू, असे कंपनीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा करून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा रक्कम जमा करावी, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक श्री.मनोज ढगे यांच्याकडे केली.
आचारसंहितेमुळे आम्ही शांत होतो, आता आचारसंहिता संपली आहे, त्यामुळे येत्या 8 दिवसांत वंचित पात्र-अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करा, अन्यथा 8 दिवसांनंतर पिकविम्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला.
यावेळी विनायक सरनाईक, नितीन राजपूत, आकाश माळोदे, अमोल मोरे, रामेश्वर अंभोरे, गजाननबाप्पू देशमूख, राहुल शेलार, महेंद जाधव, उमेशसिंग राजपूत, सदाशिव जाधव सर, भागवत धोरण, विजय बोराडे, गजानन कुटे, सतीश सुरडकर, संतोष शेळके, विशाल पानझाडे, गोपाल चिंचोले, बंडू देशमूख, सुरेश पवार, कडुबा मोरे, अमीन खासाब, मुकिंदा शिंबरे, राहुल बिल्लोरे, श्रीकांत पाटील, गजानन कुऱ्हाडे यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.