प्रा हेमंत चोपडे यांच्या ‘शून्य,एक अंनत प्रवास’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार जाहीर….

नांदुरा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी;- विदर्भाचे सुपुत्र नांदुरा तालुक्यातील कोळंबा येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हेमंत चोपडे यांच्या ‘शून्य,एक अनंत प्रवास’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वांड्मय पुरस्कार अंतर्गत शिक्षणशास्त्र या प्रकारात स्व कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रा.हेमंत चोपडे हे नुकतेच मागील महिन्यात स्वामी विवेकानंद आश्रम शाळा चिंध्याची वाडी जिल्हा ठाणे येथून मुख्याधपाक या पदावरून सेवानिवृत्त झाले असून त्यांनी त्यांच्या शैक्षणिक सेवेसोबतच साहित्याची आवड जोपासत विविध साहित्यांचे लेखन केले आहे.महाराष्ट्र मिलिटरी स्कूल ठाणे च्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या गवताला फूटती भाले, आंबेडकर-सावरकर एक समांतर प्रवास, भारतरत्नांच्या देशा या पुस्तकास सुद्धा अंकुर वांग्मय पुरस्कार, हुतात्मा वीर जगदेवराव भालेराव साहित्यिक पुरस्कार, भगवान ठग तुका म्हणे पुरस्कार पुरस्कार मिळालेले आहेत.
शून्य,एक अनंत प्रवास या पुस्तकामध्ये हेमंत चोपडे यांनी शून्याची उत्पत्ती आणि महती अध्यात्मिक,भौगोलिक, वेद व उपनिषदांचे संशोधन करून शून्याचे विकसन व शून्याचा जगभरचा झालेला प्रवास मांडला आहे. शून्याच्या स्वीकाराने जगभरात डिजिटल क्षेत्रात विज्ञानाने गरुड झेप घेतलेली आहे. त्यांच्या या पुस्तकाची सर्वत्र वाहवा झाली आहे..
दोन वर्ष चाललेल्या कोरोना काळातील त्यांच्या गणित विषयातील ‘एक संबोध एक चाचणी’ला उत्तम प्रतिसाद मिळत त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना टीचर्स इनोव्हेशन अवॉर्ड सर फाउंडेशन पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. या शिवाय नारळापासून विविध शिल्प बनवणे,ओरिगामी, विविध वाद्य वाजवणे,विविध विषयावर व्याख्याने देणे यात सुद्धा त्यांचा हातखंडा आहे. वाचनकलेचे शास्त्र व वैदिक गणित ही पुस्तके सुद्धा मागील महिन्यात प्रकाशित झालेली आहेत. हेमंत चोपडे यांच्या शून्य, एक अनंत प्रवास या पुस्तकाचे शब्द मल्हार प्रकाशन, नाशिक यांनी प्रकाशन केले आहे.
एक लाख रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून मराठी भाषा गौरव दिन म्हणजे 27 फेब्रुवारी मुंबई ला शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या पुस्तकांच्या वाचकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.