Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ‘समिती ‘ आक्रमक …१ मे महाराष्ट्र दिनाचा निषेध करुन काळा दिवस पाळणार – एडवोकेट वामनराव चटप 

जिल्हया - जिल्हयात धरणे देणार तर २५ मे रोजी "पश्चिम विदर्भ मेळावा" 

Spread the love

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- केंद्र सरकाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ति करावी,अन्नधान्यावरील G.S.T. तात्काळ रद्द करावा, यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक मे महाराष्ट्र दिनावर समितीने बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्र दिन हा आमच्यासाठी काळा दिन असून त्यावर बहिष्कार घालत असल्याची घोषणा आज विदर्भात राज्य आंदोलन समितीचे प्रमुख एडवोकेट वामनराव चटप यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बुलढाणा येथे केली.

या वेळी माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या सह महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रंजनाताई मामर्डे, समितीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रा. राम बारोटे, प्रा. एस पी हिवाळे, दामोदर शर्मा, सुखदेव नरोटे, प्रकाश घुबे ,अनिल रिंढे,रामदास शिंगणे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना एडवोकेट वामनराव चटप म्हणाले,मराठी भाषिकांचे वेगळे राज्य असावे, म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, *संयुक्त महाराष्ट्र चळवळ* सुरू झाली. या चळवळीत वैदर्भियांना, भाषेच्या नावाखाली भावनिक आवाहन करण्यात आले होते. त्यास संपूर्ण विदर्भातील जनतेने पाठिंबा दिला. परिणामी १ मे १९६० रोजी मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. याच दिवसापासून, संपन्न विदर्भ प्रदेशाची अक्षरशः लूट सुरू झाली. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी, मुंबईकर व्यावसायिकांच्या सोबत संगनमत करून विदर्भातील खनीज, कोळसा, वीज, वनसंपदा, शेतमाल याचे बेमालूमपणे शोषण सुरू केले.मागील पाच दशकात विदर्भाला भिकार अवस्थेत आणून ठेवले आहे. त्यामुळे १ मे हा महाराष्ट्र दिन विदर्भासाठी काळा दिवस ठरला. विदर्भातील जनतेने आपले वेगळे राज्य असावे, यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्याने लढा देत आहे. त्याचा एक भाग म्हणून विदर्भातील जनतेने १ मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून त्याचा निषेध करावा असे आवाहन ॲड. वामनराव चटप यांनी केले.  सरकारचे उच्च शिक्षण धोरण तर अत्यंत भयावह आहे. मागील २ दशकांपासून शिक्षक जवळपास भरती बंद आहे. केवळ कंत्राटी आणि तासिका तत्वावर शिक्षक नेमून अतिशय तुटपुंज्या पगारावर त्यांना *बंधुआ* मजूर करून टाकले आहे. कित्येक वर्षापासून हे उच्च शिक्षित तरूण विमनस्क अवस्थेत शाळा महाविद्यालयात, शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. फक्त या आशेवर की, कधीतरी आपणास नोकरीत नियमित करण्यात येईल. पण याबाबतीत शासन पूर्णतः डोळे बंद करून आहे. शेतकरी आत्महत्या अजून सुरूच आहेत, आता या मध्ये त्यांच्या घरातली उच्च शिक्षित तरूण मुले – मुली बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. वेळीच त्यांचे समुपदेशन केले नाही तर, आपणास *गाव शिवार व मध्यम वर्गातील उच्चशिक्षीत तरुणांच्या प्रेतयात्रेत सामील व्हावे लागेल* हे भीषण वास्तव लक्षात घेऊन, येत्या २५ मे ला अमरावती येथे *कंत्राटी व तासिका तत्वावर कार्यरत शिक्षक आणि सरपंच मेळावा* आयोजीत करण्यात आला असल्याची माहिती प्रा. डॉ. पी. आर. राजपूत यांनी प्रस्तुत केली.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्य अधिक गतिमान व्हावे यासाठी, घटनेच्या तरतुदीनुसार, *जिल्हा व तालुका कार्यकारिणीची पुनर्रचना* करण्याचा प्रस्ताव प्रस्तुत करताना , यातूनच वेगळ्या विदर्भाची चळवळ खऱ्या अर्थात *जनआंदोलनाचे* स्वरूप धारण करेल असा विश्वास महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रंजनाताई मामर्डे त्यांनी व्यक्त केला.

      जिल्हाध्यक्षाची धुरा प्रा. बारोटे यांच्या खांद्यावर

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष पदी प्रा. राम बारोटे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र व अधिकृत घोषणा ऍडव्होकेट वामनराव चटप यांनी या वेळी केली. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समितीच्या वतीने बारोटे यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page